आर्यावर्तापासून ( जंबूद्विपे )’भारत’ देशापर्यंतचा गौरवशाली इतिहास, जाणून घ्या राजा भरताची शौर्यगाथा अन भारत देश..!
स्वतःच्या गावातून…
आपल्या देशाला ‘भारत’ हे नाव कसे मिळाले, याबद्दल अनेक इतिहासकार, पुराणे आणि ग्रंथांमध्ये स्पष्ट उल्लेख आढळतात. भारताला ‘हिंदुस्तान’, ‘इंडिया’ किंवा ‘आर्यावर्त’ अशा अनेक नावांनी ओळखले जात असले, तरी ‘भारत’ या नावाचा संबंध थेट चक्रवर्ती राजा भरत यांच्या शौर्याशी आणि पराक्रमाशी जोडला गेला आहे. आज आपण याच महान राजाचा आणि आपल्या देशाच्या नामकरणाचा रंजक इतिहास जाणून घेणार आहोत..!
पौराणिक इतिहासानुसार, हस्तिनापूरचे राजे दुष्यंत आणि शकुंतला यांचे पुत्र म्हणजेच ‘भरत’. भरत हे लहानपणापासूनच अत्यंत शूर आणि निर्भय होते..!पुढील काळात ते एक महान चक्रवर्ती सम्राट झाले. त्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर संपूर्ण भारतीय उपखंडावर एकाच छत्राखाली राज्य स्थापन केले. त्यांनी चारी दिशांना विजय मिळवून एका विशाल साम्राज्याची निर्मिती केली..!
ऋग्वेदापासून ते पुराणांपर्यंत अनेक ठिकाणी राजा भरत आणि देशाच्या नावाचा संबंध स्पष्ट केला आहे..!
विष्णू पुराणातील दाखला – विष्णू पुराणात एका श्लोकाद्वारे भारताच्या भौगोलिक स्थितीचे आणि नावाचे वर्णन केले आहे –
“उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्। वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः॥” ( समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला असणाऱ्या भूभागाला ‘भारत’ म्हणतात आणि तिथे राहणाऱ्या प्रजेला ‘भारती’ (भारतवासी) म्हटले जाते..!)
साम्राज्याचा विस्तार – राजा भरत यांनी धार्मिक, न्याय्य आणि शक्तिशाली राज्याची स्थापना केली. राजा भरत यांच्या पराक्रमाणे देशाचा विस्तार हा म्यानमार पासून ते इराण पर्यंत केला. त्यांच्या याच विशाल साम्राज्याला (भरत खंड) पुढे त्यांच्या नावावरून ‘भारतवर्ष’ किंवा ‘भारत’ म्हणून ओळखले जाऊ लागले..!
इतर काही ऐतिहासिक मतप्रवाह -राजा दुष्यंतपुत्र भरत यांच्याशिवाय इतिहासात आणि धार्मिक ग्रंथांमध्ये इतरही काही ‘भरत’ नावाचे उल्लेख मिळतात, ज्यांचा संबंध देशाच्या नावाशी जोडला जातो –
1. जैन धर्मातील मान्यता -जैन ग्रंथानुसार, पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांचे थोरले पुत्र भरत चक्रवर्ती’ यांच्या नावावरून या देशाला ‘भारत’ हे नाव मिळाले..!
2. ऋग्वेदातील ‘भरत’ वंश -वैदिक काळात ऋग्वेदात ‘भरत’ नावाच्या एका बलाढ्य टोळीचा किंवा वंशाचा उल्लेख आहे. ज्यांनी ‘दशराज्ञ युद्ध’ (१० राजांचे युद्ध) जिंकले होते. त्यांच्या प्रभावामुळे या भूभागाला भारत नाव पडले असावे, असेही काही इतिहासकार मानतात..!
आजचा आधुनिक भारत हा हजारो वर्षांच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा वारसा जपणारा देश आहे. एका शूर, न्यायी आणि पराक्रमी राजाच्या नावाने ओळखला जाणारा आपला देश आजही जगात आपली एक वेगळी आणि स्वाभिमानी ओळख टिकवून आहे..!
Ck – विशेष प्रतिनिधी, इतिहास विभाग.
