महाविद्यालयीन अभ्यासक्रमातून चांगले आणि सुजाण नागरिक तयार व्हावेत..! प्राचार्य डॉ.राजधर टेमकर
सोमेश्वरनगर
आज आपल्या समाजासमोर अनेक प्रश्न असल्याने चांगला भारतीय नागरिक घडविण्यासाठी ‘गुड सिटीझनशीप’ सारखाविषय अभ्यासक्रमात असला पाहिजे असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र व लोकप्रशासन अभ्यासमंडळ आणि राज्यशास्त्र विभाग, मु. सा. काकडे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने द्वितीय वर्ष बी.ए. या वर्गाच्या अभ्यासक्रम
पुनर्रचना व पुनरावलोकन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देविदास वायदंडे होते.यावेळी व्यासपीठावर राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. दत्तात्रय वाबळे, पुण्यातील एफ.सी.चे उपप्राचार्य डॉ. प्रकाश पवार
डॉ.अरुण राख, डॉ.राहुल नरंगगलकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. निलेश आढाव, राज्यशास्त्र अभ्यासक्रम कार्यशाळेचे समन्वयक डॉ
नारायण राजूरवार आदी मान्यवर उपस्थित होते
या प्रसंगी बोलताना पुढे डॉ.राजधर टेमकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये नवीन संकल्पना, नवीन विचार प्रवाह, आधुनिक स्किल्स यांचा समावेश होणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना चांगला भारतीय नागरिक घडविण्यासाठी ‘गुड सिटीझनशीप’ सारखा विषय अभ्यासक्रमात असावा. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण व उपयुक्त संकल्पनांची माहिती व्हावी यासाठी अभ्यास मंडळाने अभ्यासक्रमामध्ये राजकीय सहाय्यक, गुड सिटीझनशीप, राजकीय संभाषण, फील्ड प्रोजेक्ट यांसारख्या संकल्पनांचा समावेश केला आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) प्रभावीपणे अंमलात आणण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेत पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक प्रतिनिधी आणि मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्राध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेत अभ्यासक्रमावर सविस्तर चर्चा करून आवश्यक उपाय व सुधारणा सुचविण्यात आल्या.
याप्रसंगी अभ्यासमंडळाचे सदस्य डॉ. दत्तात्रय वाबळे व डॉ. प्रकाश पवार यांनी नव्याने येणाऱ्या अभ्यासक्रमाची मांडणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निलेश आढाव यांनी केले, तर राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य आणि अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचे समन्वयक डॉ. नारायण राजूरवार यांनी आभार व्यक्त केले.
